प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : जिल्हा परिषदेच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करत राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मैनाक घोष यांची बदली करून त्यांची सांगली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी श्रीमती प्रियंवदा महाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मैनाक घोष यांनी धाराशिव जिल्हा परिषदेत कार्यरत असताना विविध विकासकामांना गती देण्याचे काम केले. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित योजना मार्गी लागल्या असून प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता. त्यामुळे त्यांच्या बदलीकडे एक महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेल्या सीईओ श्रीमती प्रियंवदा महाडदळकर या अनुभवी आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी विविध प्रशासकीय पदांवर काम करताना उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांना आणखी गती देणे, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नागरिकांपर्यंत सेवा अधिक सुलभ करणे, यावर त्यांचा भर राहणार असल्याचे बोलले जात आहे.
या बदलामुळे जिल्हा परिषद प्रशासनात नव्या ऊर्जेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या सीईओंच्या नेतृत्वाखाली विकासकामांना अधिक वेग मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. तसेच मैनाक घोष यांना सांगली जिल्हाधिकारी म्हणून नव्या जबाबदारीतही यश मिळो, अशा शुभेच्छा विविध स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.
