धाराशिव – आ. कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाडोळी जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आमोल नागनाथ गुंड (सर), पाडोळी पंचायत समिती गणाचे उमेदवार आमोल उर्फ शंभुराजे मस्के तसेच समुद्रवाणी गणाच्या उमेदवार शाहना तौफीक तांबोळी यांच्या प्रचारार्थ टाकळी येथे जाहीर सभा उत्साहात पार पडली.
यावेळी बोलताना आ. कैलास पाटील म्हणाले की, “लोकप्रतिनिधी कसा असतो हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ. आमोल गुंड हे उच्चशिक्षित, अभ्यासू आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेले उमेदवार असून ते या भागाचा सर्वांगीण विकास करतील.”
तसेच “पक्षाचा विचार न करता आपण शेतकरी, शेतमजूर आहोत याचा विचार करून मशालीला मतदान करा,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राची शेती कुठे दिसते? 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगून सत्ता मिळवली, आज शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे का?”
तसेच यावेळी रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अॅड. अजित गुंड यांनी रुपामाता परिवाराच्या सामाजिक कार्याचा माहिती सांगून शेतकरी वर्गाच्या हितासाठी काम करत रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य आपल्या भागात केल्याचे त्यांनी सांगितले. “राजकारण आणि समाजकारण हा वारसा असून तो सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चालवला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
उमेदवार आमोल गुंड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “जिल्हा परिषद गट कसा असला पाहिजे याचा आगळा-वेगळा, विकासाभिमुख आदर्श आम्ही निर्माण करू. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारी कामे प्राधान्याने केली जातील.”
आ. कैलास पाटील यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करत
चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. “आनंदाचा शिधा देणारे सरकार हायब्रीड देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे,” असा आरोप यावेळी करण्यात आला.
विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना सांगण्यात आले की, पाडोळीवरून टाकळीला येताना रस्त्यांचा विकास स्पष्टपणे दिसतो. “मोठी व खोटी स्वप्ने दाखवणार नाहीत, तर जिल्हा परिषद शाळा दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर विकसित करू. आरोग्य उपकेंद्र सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत ठेवू. शुगर व बीपी तपासणीची शिबिरे गावागावात राबवू. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यांनी थेट बांधावर जाऊन जनावरांवर उपचार करणे बंधनकारक केले जाईल,” असे आश्वासन देण्यात आले. या सभेला पदाधिकारी,शिवसैनिक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
