मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास घडला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा अजित पवार यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
आज मंत्रालयात पार पडलेल्या पदभार स्वीकार समारंभात मुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पदभार स्वीकारताना सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यातील महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, विकासात्मक धोरणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “ही जबाबदारी केवळ पदाची नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आत्मविश्वास देणारी आहे. महिलांचे प्रश्न, युवकांचे भविष्य, शेतकऱ्यांचे हित आणि राज्याचा सर्वांगीण विकास हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.”
सुनेत्रा अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीने राज्यातील महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. विविध महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी नवे धोरण, शिक्षण, आरोग्य, रोजगार व स्वावलंबनाच्या दिशा अधिक भक्कम होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या विकास प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी त्या ठोस पावले उचलतील, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
